एका सत्य संवाद – काय बोलला शेतकरी?
माझी जेव्हा कधी गावी चक्कर होते तेव्हा प्रवासात मला काही गोष्टींची सवय लागून गेली. त्यात मग एखाद्या प्रवाश्याला लिफ्ट देऊन त्याच्या दैनंदिनीची चौकशी करणे असेल , प्रवास मार्गावरील नवीन उद्योगांना जाऊन भेट देऊन त्याची माहिती घेणे असेल किंवा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी हितगुज असेल. या सर्वांमागाचा उद्देश फक्त माझ्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे मिळून देणे एवढाच. प्रत्येक प्रवासाअंती मला काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टींचे अनुभव आले आणि बर्याचदा चर्चेचा शेवट राजकारणाशी येउन थांबला, विलाज खुंटल्या सारखा.
आजचा संवाद आहे अहमदनगर जील्ह्यातील श्रीगोंदा-पारनेर तालुक्यांच्या सीमेवरील १५०० लोकसंख्या असलेल्या गावातील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा.
८-१० फुट रुंद रस्त्त्याच्या मधोमध एक साठी पूर्ण केलेली सायकल, सर्वबाजूने गंज लागून चढलेला लाल-पिवळा रंग, ऑपरेशन करून टाके दिल्याप्रमाणे ठिकठीकाणी वेल्डिंगच्या खुणा, समोर दोन व पाठीमागे चार दुधाच्या अडकवलेल्या किटल्या आणि मधोमध जनावरांसाठी मकेची भली मोठी पेंढी. त्या पेंढीने पूर्ण रस्ता व्यापून घेतल्याने मला नाइलाजास्तव तेथे थांबावे लागले आणि मनातल्या मनात सायकल लावणाऱ्याचा उद्धारहि झाला. तेथून काही अंतरावरून एक साठीतले गृहस्थ चालत येत होते. धाडीचे वाढलेले पांढरे खुंट, डोक्याला गुंधाळलेली जुनी मफलर, अनेक थिगल्यांची मळकटलेली कोपरी, हातात एक मकेच चिपाड आणि जुनी चामड्याची विमानटायर चप्पल घातलेले पाय झपाझप पुढे येत होते. अवतारावरून सायकल त्यांचीच असावी असे वाटले आणि आजूबाजूला इतर कोणी नसल्याने खात्रीही पटली. मी रागाच्या भारात काही बोलणार तर त्यांनीच सुरुवात केली . “जरा चिपाड पडलं व्हत, आणायला गेलतो… इकातच हाय ना… काय करता? ” असे बोलून चर्चेला सुरवात केली.
त्यांचे शब्द ऐकल्याबरोबर मनातल्या रागाची जागा अनेक प्रश्नांनी घेतली आणि एक एक करून विचारपूस व प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला, अनेक वर्षांची ओळख असल्यासारखी.
विकत चा चारा? का बर? जमीन नाही का तुम्हाला?
“हाय ना, पर समदी पडीक पडलिया, २ वरीस झालं चांगला पाउस नाही. वरल्या रामान तळयातून पाइपलाइन केली, त्याच्याकडूनच घेतली इकात.”
मग तुम्ही का नाही केली पाइपलाइन?
“खायाची वांधे, पाइपलाइन कुठून व्हायची? त्यात तळ्यात बी पाणी नाही सुटत वापरायला. आधीच पोरीच्या लग्नाचं कर्ज हाय डोक्यावर त्यात पिक नाही, काम-धंदा नाही. दुष्काळात कर्ज फेडायला दुसरा रस्ता नाही म्हणून डेरीवाल्याकडून उच्चल घेतली न घरच्या दोन अन अजून दोन अश्या चार गाया केल्या दुध धंद्यासाठी पण कसल काय चारी बाजून मारानच. ”
का बर मरण? गायी दुध नाही देत का?
“देत्यात कि, हे बघा दोन्ही ताइमाच ६५ लिटर घालून आलो आत्ताच डेरीला तरी घरची एक जरा कमी पडली, गाभण हाय ना. पण हे सरकार कुठ जगून देतंय गरिबाला? आच्छे दिन म्हणून लुटलं आम्हाला न कसलं काय”
का बर?
“हे बघा दुष्काळ म्हणून काही काम नाही का धंदा नाही, जमीन पडीक. पिकापान्याची कर्ज डोक्यावर, जगायचं कस म्हणून माझ्या सारख्या लई शेतकर्यांनी जमवलेला पैसा घालून, कर्ज घेऊन दुध धंदा वाढवला. बर आधी आधी भाव बी व्हता. २६ रुपय मिळायचं लिटर ला पाणी घातल्याल नसल तर. मग इकतचा चारा, इकातचा खुराक, जनावरांची दुखणी-बहाणी जाउन उरायच थोडफार. पण आता सरकारनि दूधाच भाव केल्यात कमी, आता १५ नाहीतर १६ रुपय मिळत्यात लिटरला. एकदम १० रुपायाचा फटका. म्हणजी तुमच पाणी आता महाग मिळतंय १७ रुपायला बाटली अन दुध १५. सांगा कस जगायचं? बर सरकारणी खुराकाच भाव कमी नाही केल तवा खर्च हाय त्योच आन दुधाचा पगार कमी. म्हणून आता गाई धंदा परवडणा, समदा लॉस मंदी चाललाय, खिशातून भरतोय वरची पैस, इलाज नाही.”
खिशातून कशाला भरता? त्यापेक्षा विकून टाका न फिरवा कर्ज माघारी.
“ते बी करून पाहिलं बाबा. आता ह्या गायी ९० हाजाराला एक आशा दोन घेतल्या पण दूधाच भाव पडल्यान बाजारात कुणी कुत्रं इचारीना जनावराला अन जे माघतेत ते पार भाव पाडून. माझी ही ९० वाली ६० ला माघितली. कशीकाय द्यायची सांगा, आणल्या माघारी पदरच भाड भरून. पार वाटूळ झालं. एका गाईला गोऱ्हा झाल्याला, ते काय आमच्या कामाच हाय का? कसाईला वासरू इकाव तर त्याच्यावर बी बंदी आणली सरकारणी. कसाई गावात यायचं बंद झालं, आता काय त्याला चारा चुकणार हाय का पाणी? अन त्याला मारून बी टाकता येत नाही. आमची तर आक्कल चालना. मुसक्या घालून बुक्याचा मार देताय सरकार गरिबाला. माल पिकवायचा आम्ही आणि व्यापार्याला मोठ करायचं बाकी काय? आजून एक सांगतो तुम्हाला, परवा पाहून आल व्हती पुण्याहून, शेजारच्याच गावची हायेत, पुण्यात रिक्षा चालावतेत. ते म्हणाले आम्हाला दूधाच पाकीट घ्याव लागत म्हणून. ४० रुपयाला लिटर अन तेबी पाण्यागत दुध. हाय का नाही लुबाडायचा धंदा. आमच शेतकऱ्याच पिवर दुध १५ रुपय, न तिकड शिटीत गरीबांला पाणी घालून ४० रुपये. सगळी मलई व्यापाऱ्याच्या घाशात. मग का नाही घेणार शेतकरी फाशी? आपल्या इकड नाही मेल कुणी आजून पण मरत्यान आसच चाल्यावर. तिकड विदर्भात का मराठवाड्यात रोज लोक फाश्या घेत्यात. काय करत्यान बिचारी. दुष्काळ मदत २१ रुपयाचा चेक आलता मागच्या येळेस, या येळला त्योबी नाही. ”
“चला जितराब वाट बघत आसत्यान चाऱ्यासाठी. जाव लागण. चला चहा प्यायला, जवळच हाय घर.”
त्याची करून कहाणी ऐकल्यावर त्याने केलेला चहाचा आग्रह हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. ज्याचे जगायचे वांधे तो चहा साठी येवढा आग्रह कसा धरू शकतो आणि तो हि अनोळखी माणसाला. मी त्या शेतकऱ्याला कसातरी ‘नाही’ म्हणून पुढच्या प्रवासाला निघालो मात्र त्या गृहस्थाचा सतेज चेहरा बाकी माझ्या डोळ्यासमोरून जाईना.
मात्र आज मला एक नवीन गोष्टीची समज आली होती, जे वर्षानुवर्षे या भारत देशाला जगवत आलेत, ज्यांनी सर्व भारतीयांना अन्नाचा तुकडा मिळावा म्हणून काबाड कष्ट केले, तो सगळ्यांचा पोशिंदा मात्र तसाच वर्षानुवर्षे वंचित आहे. केंद्रात, राज्यात जाहीर झालेली एकही योजना त्याच्यापर्यंत सुखरूप पोहचत नाही आणि त्यांच्या विरुद्ध बंड करण्याइतपतची हिम्मत त्याचे पोट त्याला करू देत नाही. आपल्या देशाचे प्रधानमंत्री जगभरातील देशांमध्ये पोहचले मात्र त्यांना देशातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचता आले नाही हि खंत. सुरुवातीच्या काळात मोदींची ‘मन कि बात’ हि सर्वांसाठी प्रेरणादायी आशेचा किरण असताना सेवा कारमधील वाढ, पेट्रोल दर वाढ, दुधाचे गडगडलेले भाव, जमीन अधिग्रहण आणि असे बरेच बदल तसेच कालेधन व भ्रष्ट कारभारावरील खोट्या आश्वासणामुळे चिडचिड करायला लावणारी आणि अस्वस्थ करणारी बात वाटायला लागली आहे.
हा सगळा शेतकरी, कामगारवर्ग व सर्वसामान्यांवरील अन्याय पाहता, चाललेला विकास हा सर्वसमावेशक विकास वाटत नाही आणि एखादा विकास जर समाजातील सर्व घटकांना घेऊन झालेला नसेल तर तो विकास नसून फक्त एक बदल आहे, काही ठराविक गटाला लक्षात ठेऊन केलेला. मोदी सरकारला प्रत्येक स्थरातील लोकांनी भरभरून मतदान केले आणि आता विकास नक्की अशी भाबडी आशाही धरली. गेलेल्या एक वर्षात जरी सरकारचे निराशजनक काम झाले असले तरी लोकांच्या मनात अजूनही सर्वसमावेशक विकासाची आशा आहे आणि त्या आशेला सरकारने खरे उतरावे एवढीच मनोमन सदिच्छा.
सय्यद अय्याज
ayyaj.sayyad1249@gmail.com